चाळीसगाव (प्रतिनिधी ) ;- शासनाच्या विविध योजनेतून शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड, वृक्ष लागवड योजना असूनदेखील जनजागृती अभावी शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या योजनेतून आर्थिक उन्नतीसोबत पर्यावरणास मोठी मदत होणार आहे.या योजनेची जळगाव लोकसभा मतदारसंघात जनजागृती राबवून बळीराजाच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल का यासाठी मी प्रयत्नशील आहे. आंबा, डाळिंब, बोर,सीताफळ,पेरू, लिंबू, कागदी लिंबू,मोसंबी, संत्री, आवळा ,चिकू, चिंच, कवट, जांभूळ, गुलाब, मोगरा, निशिगंध साग व बांबू या वृक्षांची लागवड करून शेतकऱ्यांच्या जीवनात नवसंजीवनी आणण्यासाठी जनजागृती रथातून बळीराजा आत्मनिर्भर अभियान जळगाव लोकसभा मतदारसंघात राबविणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली. बळीराजा आत्मनिर्भर अभियान यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, ग्रामसेवक संघटनेचे राज्य पदाधिकारी संजीव निकम,भाजपचे जिल्हा सरचिटणीस के.बी.दादा साळुंखे ,माजी सभापती संजय पाटील, माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे, विस्तार अधिकारी के.एन.माळी, आत्माचे ज्ञानेश्वर पवार, समाधान पाटील, श्रीमती घोरपडे मॅडम, सामाजिक वनीकरणचे श्री.काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रथ यात्रेतून जनजागृती
या योजनेतून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. यासाठी या अभियानात मोबाईल ॲप्स वर नोंदणी करता येणार आहे. त्यामूळे ईच्छुक लाभार्थी निवड करता येईल. त्यांचे पर्यंत लाभ पोहचता येईल. तसेच याची जनजागृती व्हावी यासाठी माहिती पत्रक , माहिती फलक असलेला रथ तयार केला जाणार आहे. त्यातुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना याची माहिती मिळणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.








