जळगाव तालुक्यातील धानोरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आजाराला आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. शिवाजी चिंधा पाटील (वय-५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहे. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, “आजाराला आणि कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे”. शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
त्यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. नातेवाईकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.