जळगाव तालुक्यातील जळके येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील जळके येथील शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सोमवारी दिनांक २४ जून रोजी रात्री १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
संभाजी कडूबा पाटील (वय ५० रा. जळके ता.जि.जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. संभाजी पाटील हे परिवारासह जळगाव तालुक्यातील जळके गावात वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. बुधवार दिनांक १९ जून रोजी दुपारी २ वाजता त्यांनी शेतात सततची नापीकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी दिनांक २४ जून रोजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.