अमळनेर शहरातील गांधीनगरातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : येथील गांधीनगर भागात नगरपालिकेने अतिक्रमणात काही घरे पाडून टाकली. यामुळे अनेक घरे उजाड झाली. त्यात एका वृद्धाने तर घर पडल्यावरही अतिक्रमणाच्या मलब्यावरच राहायला सुरुवात केली. उघड्यावर ऊन, पाऊस यांचेसोबत राहून वृद्ध आजारी पडला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत असून घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
धुडकू सुकलाल मराठे (वय ७०) असे मयत वृद्धाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी अमळनेर पालिकेकडून गांधीनगर येथील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक कुटुंब उघड्यावर आले. पालिका अतिक्रमण धारकांना टाकरखेडा रस्त्यावर म्हाडा कॉलनीत घरे द्यायला तयार आहे आणि अतिक्रमण धारक म्हाडा मध्ये जायला तयार नाहीत. त्यांना घरे मिळालेली नाहीत असा आरोप अतिक्रमण धारकांनी केला आहे. हा वाद न्यायालयात पोहचला असून न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिल्याने अतिक्रमण काढलेला मलबा तसाच पडून आहे. अतिक्रमण धारक काही कुटुंब याच ठिकाणी उघड्यावर बस्तान मांडून आहेत. उन्हात दिवस काढायचा असाच नित्यक्रम धुडकू सुकलाल मराठे यांचाही होता.
पत्नी, मुलगी, नातू, नातसून यांचे पालनपोषण बसस्थानकवर टपरी चालवून करत होते. दिवसभर ऊन चटके देत होते. गर्मीमुळे त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी धुडकू मराठे आजारी पडले. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना दवाखाण्यात नेऊ शकले नाही. तब्येत बिघडत चालली होती. आजूबाजूचे लोक विचारपूस करायला आले असता धुडकू मराठे त्यांना, मी येथून हलणार नाही. मेलो तरी चालेल. मला याच ठिकाणी असलेल्या झाडाच्या लाकडात जाळा असे सांगत होते. दगड मातीच्या ढिगाऱ्यावर असलेल्या खाटेवरच ३१ मार्च रोजी रात्री साडे सात वाजेला त्यांनी जीव सोडला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून अनेकांचे मन हेलावून गेला.