आसोदा-मन्यारखेडा रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून शेतकरी बैलगाडी काढत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. मात्र जेव्हा पाणी खोल आहे असे वाटले, त्यावेळी त्याने बैलांच्या दोऱ्या सोडल्या. बैल हिसके देऊन बाहेर आले. पण शेतकरी स्वतः बुडाला व त्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ११ जून रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
सुकलाल लालचंद माळी (वय ६३ रा. आसोदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. आसोदा गावात सुकलाल माळी हे पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी दिनांक ११ रोजी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल. सुकलाल माळी हे सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान रस्त्यावर रेल्वेचा बोगदा आहे. पावसामुळे या बोगद्यात पाणी साचलेले होते.
त्यावेळी याकडून पलीकडे जाण्यासाठी सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून जाण्यासाठी टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली. तेव्हढयात भेदलेल्या बैलांनी झटका देवून बाहेर आले. परंतू सुकलाल माळी यांना पोहात येत नसल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना तपासून मयतघोषित केले. कुटुंबीयांनी प्रसंगी एकच आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यची नोंद करण्याचे काम सुरू होते