मुंबई (वृत्तसंस्था ) – राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली. राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.
“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.