एकाचवेळी सात जणांवर झाले अंत्यसंस्कार
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवेल येथील सात जणांचा नेपाळमधील अपघातात मृत्यू झाला. या मृतदेहांवर शनिवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या सातही देहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावापासून एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या स्मशानभूमीचा ग्रामपंचायत इकडून विस्तार करावा लागला आहे. तळवेल येथे स्मशानभूमीत दोनच ओटे होते. आता नेपाळमधील दुर्घटनेत गावातील सात जणांचा मृत्यू झाला. या सर्वांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करता यावे यासाठी ग्रामपंचायत आणि युवकांनी शनिवारी तातडीने आणखी ओटे तयार केले आहेत.
सरपंच उल्हास भारसाकळे यांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी पथदिवे लावण्याचे काम हाती घेतले. तर तरुण मंडळींनी गावाबाहेर असलेल्या स्मशानभूमीची जागेसाठी जेसीबीच्या साह्याने टेकडी कोरून मोकळी केली आणि आणखी अतिरिक्त ओटे तयार केले. तळवेलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी एवढ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सुहास राणे (५०), सरला सुहास राणे (४५), मुलगी चंदना सुहास राणे (१९) हे एकाच घरातील तीन जण तर प्रकाश कोळी (५०) आणि त्यांचे जळगाव येथील मेहुणे तुळशीराम तायडे (६५), त्यांच्या पत्नी सरला तुळशीराम तायडे (६२, रा. जळगाव), मंगला विलास राणे (वय ५०) हे ठार झाले आहेत. रेखा प्रकाश कोळी, सीमा अनंत इंगळे, अनंत ओकर इंगळे, आशा पांडुरंग पाटील, प्रवीण पांडुरंग पाटील हे पाच जण जखमी आहेत.