जळगावात खाजगी रुग्णालयात केले होते दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : अमरावती येथील विवाहितेने कुठल्यातरी कारणावरून रविवारी दि. १२ मे रोजी सकाळी विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना जळगावात खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर त्यांचा सोमवारी दि. १३ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
कांचन विनोद तायडे (वय ४३, रा. अमरावती शहर, जि. अमरावती) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या अमरावती शहरात पती विनोद, २२ वर्षांचा मुलगा यांच्यासह राहत होत्या. कांचन यांचे अमरावती शहरात मार्केटमध्ये कापडाचे दुकान आहे. तर पती विनोद हे रिक्षाचालक आहे. यावर दाम्पत्याचा उदरनिर्वाह सुरु आहे. मुलगा पदवीच्या तृतीय वर्षाला आहे. रविवारी दि. १२ मे रोजी सकाळी घरात असताना कांचन तायडे यांनी कुठल्यातरी कारणावरून विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना समजताच त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
कांचन यांचे माहेर जामनेर तालुक्यातील नेरी आहे. त्यांचे वडील डॉक्टर असल्याने त्यांनी कांचन यांना अमरावती येथून जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना सोमवारी दि. १३ मे रोजी दुपारी ४ वाजता कांचन तायडे यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. सदर घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला होता. दरम्यान, आत्महत्या करण्यामागचे कारण समजून आलेलं नाही. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.