अमळनेर येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर दिली उत्तरे
अमळनेर (प्रतिनिधी) – भाजपच्या विरोधात देशभरातील सर्व पक्ष समान कार्यक्रमावर एकत्र येऊन लढणार आहोत. हा कार्यक्रम ठरविण्याच्यावेळी जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. सत्ताधारी भाजप पक्ष आणि देशपातळीवरील त्यांची विचारधारा सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. समान नागरी कायद्याचा प्रस्ताव अद्याप सभागृहात चर्चेला आला नाही, त्यात काय मुद्दे असतील हे जेव्हा समोर येईल, तेव्हा त्यावर योग्य चर्चा करता येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी १६ जून रोजी दिली.
राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी अमळनेरात झाले. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. दिग्विजयसिंग यांनी ईव्हीएम द्वारे निकाल बदलले जाऊ शकतात, असे सिद्ध केले आहे. आणि म्हणूनच निवडणुकीची जुनीच पद्धत असावी, अशी आमची मागणी आहे. देशामध्ये विविध राज्यांचे चित्र बदलत आहे. सत्ताधारी पक्षाला मतदार त्यांच्या कर्माची जागा दाखवत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतील, असे वाटत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
कर्नाटकात शालेय अभ्यासक्रमातून हेडगेवार यांचा धडा वगळण्यात आला. त्यावर भाजप टीका करत आहे, यावर पवार म्हणाले की, लहान मुलांचे वय हे संस्कारक्षम वय असते. आणि त्यांच्या मनावर योग्य परिणाम होतील अशा प्रकारचे लिखाण अभ्यासात असले पाहिजे. कर्नाटकात निवडणुकीपूर्वी हा विषय जाहीरनाम्यात दिला होता. राज्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकरी मालाला कपाशीला भाव नाही यावर त्यांनी शासनावर टीका केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, अशी घोषणा सरकारने केली. मात्र सरकार कमी भाव देत असल्याने उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शासनाने एजन्सीमार्फत माल खरेदी करावा किंवा शेतकऱ्यांना अनुदान तरी द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.