अमळनेर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव विसर्जन आणि ईद ए मिलाद दोन्ही सण शांततेत पार पाडण्यासाठी अमळनेर तालुक्यातील १० जण चार दिवसांसाठी तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत.
विसर्जन मिरवणूक, ईद निमित्ताच्या जुलूस शांततेत पार पाडण्यासाठी तसेच सण आनंदाने कायदा व सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर हि कारवाई करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्याबाहेर हद्दपार करण्यासाठी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे प्रस्ताव पाठवले होते. यावर खेडकर यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून १० जणांना दि. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.