मदत, पुनर्वसन मंत्र्यांच्या अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळाची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) : सततच्या पावसामुळे तालुक्यातील चौबारी येथे दोन घरे पडून नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तहसीलदारांकडे ग्रामस्थांनी केली आहे.
सततच्या पावसामुळे ओलावा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील मातीच्या घरांचे धाबे भिजून माती जड झाल्याने घरे कोसळण्याची शक्यता असते. चौबारी येथे पुंडलिक हरचंद पाटील व बारकू देविदास पाटील या दोघांची घरे ५ रोजी अचानक कोसळली. घरातील सामान दाबले जाऊन साधारणतः प्रत्येकाचे किमान एक लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ग्रामस्थांनी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. पाण्याचे डबके साचून शहरी वस्तीतदेखील नागरिकांना त्रास होत आहे. तर पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून अमळनेरच्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.