जळगाव तालुक्यातील नशिराबाद उड्डाणपुलावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील उड्डाणपुलावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी एकच अक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दिपक कडू सुर्यवंशी (वय-४५ रा. नशिराबाद ता.जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. नशिराबाद गावात दिपक सुर्यवंशी हा पत्नी जयश्री आणि दोन लहान मुली यांच्यासह राहत होता. नशिराबाद गावातील पार्वती मेडिकल वर काम करून उदरनिर्वाह करत होता. (केसीएन) रविवारी ६ ऑक्टोबर रोजी दीपक हा दुचाकीने भुसावळकडून नशिराबाद येथे येत असतांना दुपारी दीड वाजेच्या सुमारास मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात दिपकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.