जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे पुन्हा दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाजी विक्रेता महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रत्नाबाई गणेश हिवाळे ( माळी ) वय ४०, रा.लोहारा ता. पाचोरा असे मयत महिलेचे नाव आहे. पती व मुलासह ती लोहारा गावात भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. (केसीएन)दरम्यान मंगळवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहारा येथून रत्नाबाई ह्या जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी घेण्यासाठी बापू भास्कर चौधरी यांच्या रिक्षा मधून येत होत्या. दरम्यान कुसुंबा गावाजवळ रिक्षा आली असताना विराज ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये रत्नाबाई या बाहेर फेकल्या जाऊन दिशादर्शक फलकाच्या खांब्याला त्यांचे डोके आदळल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.
तर रिक्षा चालक बापू भास्कर चौधरी आणि रिक्षातील आणखी एक जण गणेश बाबुलाल जाधव (वय २८ रा. रोटवद तांडा ता.जामनेर) हे जखमी झाले.(केसीएन)दरम्यान पोलिसांना घटना घडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मयत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
लोहारा येथे घटना घडताच ग्रामस्थांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान रत्नाबाई हिवाये यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. सलग दुसऱ्या दिवशी कुसुंबा येथे अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी रिक्षाच्या धडकेत वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता.