घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दयनीय अवस्था : प्रश्न न सोडवल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
जामनेर (प्रतिनिधी) : शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे तीन तेरा वाजले असून आता हा प्रकल्प बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने शहरातील घाणीचे साम्राज्य दूर करावे, अशी मागणी करीत नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जामनेर नगरपालिका अंतर्गत २०१८ साली ओझर रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नगरपालिकेने उभा केला होता. पण पाच वर्षात या प्रकल्पाची अवस्था दयनीय झाली आहे. ज्या ठेकेदाराला हे टेंडर दिले आहे. त्याचे या प्रकल्पाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. नगरपालिका देखील या प्रकरणी काही बोलायला तयार नाही, असे ठाकरे गटाचे पदाधिकारी राहुल चव्हाण यांनी सांगितले.
तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून सगळा कचरा हा प्रकल्पामध्ये न टाकता रस्त्यावर टाकला जात आहे. त्यामुळे हा कचरा नाल्यावाटे कांग नदीला वाहत जाऊन तेच अशुद्ध पाणी वाघुर धरणात जात आहे आणि या अशुद्ध पाण्याचा नागरिकांच्या पिण्यासाठी वापर केला जातोय, असाही आरोप ठाकरे गटातर्फे करण्यात आला. यावेळी नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामध्ये राहुल चव्हाण यांच्यासह शहर संघटक उस्मान शेख, राहुल पाटील, प्रशांत सुरवाडे, अक्षय नाईक, किरण चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन दिवसात प्रकरण मार्गी न लागल्यास नगरपरिषद कार्यालयात हे आंदोलन पुन्हा करू असा इशारा संघटक राहुल चव्हाण यांनी दिला आहे.