अभियानात ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार असून,त्या निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ मोहीम दि. १७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता या थीमवर आधारीत अभियान गावागावात मोठ्या प्रमाणावर राबवावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी केले आहे.
या वर्षीच्या ‘स्वच्छता ही सेवा’ साठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चीत करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत राज्य व केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त आहेत.दि. १७ सप्टेंबर रोजी अभियानाचा शुभारंभ गाव, तालुकास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच ‘सफाई मित्र सुरक्षा शिबीर’ या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थीकरिता मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. १९ सप्टेंबर रोजी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाण,कार्यालय संस्थात्मक इमारती,व्यावसायिक व बाजारपेठ,प्रमुख रस्ते व महामार्ग, पर्यटनस्थळ,रेल्वेस्थानके,धार्मिक,अध्यात्मिक स्थळे, नदी किनारे,नाले,या ठिकाणांची साफसफाई ग्रामस्थ,विविध मंडळे, महाविद्यालये,समाजिक संस्था यांच्या भागीदारीने करण्यात येणार आहे. मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार असून दि. २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. या वेळेस ‘स्वच्छ माझे अंगण’ या उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे. स्वच्छता सेवा उपक्रमात सहभाग नोंदवावा असे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी प्रतिपादन केले आहे.