शेतकरी संघटनेकडून मागणी
चोपडा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आधीच कोरडा दुष्काळ, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची मदत सरकारने करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी केली आहे.
तापी नदीच्या महापुराने रावेर, यावल, भुसावळ, चोपडा व अमळनेर तालुक्यांमध्ये मोठे नुकसान केले. हजारो हेक्टर शेतजमिनीवरील कापूस, केळी पीक नष्ट झाले आहे. त्यातच शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने हेक्टरी सरसकट एक लाख रुपये मदत द्यावी व कर्जबाजारी शेतकऱ्याला निराशेतून बाहेर काढावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, किरण गुजर, विनोद धनगर, सचिन शिंपी, कविता पाटील, जयश्री देशमुख, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, नामदेव महाजन, सय्यद देशमुख, रवींद्र माळी, प्रेमचंद धनगर यांनी केली आहे.