जामनेर येथे निवासस्थानी पालकांसह मुलांनी घेतली भेट
जामनेर (प्रतिनिधी) : शिक्षकांची बदली होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी चक्क मंत्र्यांचेच घर गाठले. “आमचे सर आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” असे म्हणत विद्यार्थ्यांनी चक्क राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनाविनंती केली. हि घटना आहे जामनेर तालुक्यातील नवी दाभाडे गावातील. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदली रोखण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट मंत्री महाजन यांची भेट घेतली.
नवीदाभाडी शाळेतील गजानन मंडवे आणि ऋषिकेश शिंदे हे दोन शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. मात्र, त्यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी एकत्र येत ग्रामस्थ आणि पालकांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भेट घेतली आणि साकडे घातले. विद्यार्थ्यांनी सांगितले की, “आमचे शिक्षक आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची बदली होऊ नये.” त्यांच्या आग्रहाने पालक आणि ग्रामस्थही या मागणीसाठी पुढे आले. विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “मी शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलतो आणि काय करता येईल हे पाहतो.” या घटनेमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमधील नाते किती विश्वासाचे आणि मायेचे असते हे दिसून आले.