अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : आईने बाजाराला सोबत नेले नाही म्हणून तालुक्यातील पिळोदे येथील १४ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी घडली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माया सुधाकर कोळी (वय १४, रा. पिळोदे ता. अमळनेर) असे मयत तरुणीचे नाव आहे. परिवारासह ती राहते. मायाची आई मालुबाई सुधाकर कोळी या बाजार करण्यासाठी अमळनेर येथे जाणार होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी माया ही सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. (केसीएन)मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. मालूबाई ह्या बाजार करून आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला. ग्रामस्थांच्या मदतीने मायाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.दरम्यान, मुलीच्या आत्महत्येमुळे समाजमन ढवळून निघाले आहे.