गुन्ह्याची व्याप्ती जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील मोठा राजकीय नेता अडकण्याची शक्यता!
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या ४ दिवसापासून जळगाव शहरांमध्ये तळ ठोकून असलेल्या सीबीआयच्या पथकाने गुरुवारी दि. १९ डिसेंबर रोजी देखील चौकशी सत्र सुरू ठेवले. गुरुवारी सुनील झंवर यांच्यासह अनेक जणांची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती जळगाव जिल्ह्यातील एक मोठा राजकीय व्यक्ती यामध्ये अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव शहर व चाळीसगाव येथे दाखल गुन्ह्यामध्ये सीबीआय चे पथक चौकशी करीत आहे.‘बीएचआर’ प्रकरणी गुन्ह्यात झंवर परिवाराकडून लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध चाळीसगावात दाखल व ‘मविप्र’प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या दिल्ली येथिल सीबीआयच्या पथकाने मंगळवारी शहर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातील फिर्यादी निलेश भोईटे व मयुरेश भोईटे यांचा जबाब नोंदवून घेतला.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात झवर परिवाराला मदत करण्यासाठी त्रयस्थ इसमामार्फत तत्कालीन सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली, अशी फिर्याद सुरज झवर यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर जळगाव जिल्हा मविप्र संस्थेच्या वादात कट रचून संस्थेचे सचिव निलेश भोईटे यांच्या घरात सुरा ठेवण्यासह इतर बाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे.
या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली येथून सीबीआयचे अप्पर पोलिस अधिक्षक सुशांत याच्यासह दोन अधिकाऱ्यांचे पथक जळगावात आले आहे. बुधवारी तब्बल १० तास सुरज सुनील झंवर याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर गुरुवारी देखील सकाळी सुरज झंवर याच्यानंतर त्यांचे वडील सुनील झंवर यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. गुरुवारी सकाळी १० ते १ पर्यंत सुरज झंवर यांचा जबाब पूर्ण करण्यात आला तर दुपारपासून रात्रीपर्यंत सुनील झंवर यांचा जबाब घेण्यात आला. उर्वरित जबाब शुक्रवारी घेतला जाणार आहे. तर शुक्रवारी दुपारनंतर जळगाव येथील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी निलेश भोईटे आणि मयुरेश भोईटे यांचा अपूर्ण राहिलेले जबाब पुन्हा घेण्यात येणार आहे.
तसेच इतरही काही जणांची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमध्ये ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह आणखी किती जण सहभागी आहेत याचा तपास सीबीआय करीत आहे. दरम्यान या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले तर एक राजकीय बडा नेता अडकू शकतो अशी माहिती राजकीय वर्तुळातून मिळत आहे. याबाबत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील मंत्री गिरीश महाजन यांनी कशाप्रकारे महाविकास आघाडीने महायुतीच्या नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, याबाबत माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.