“रोड शो” दरम्यान खा.अमोल कोल्हे यांचे आवाहन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ सावदा येथे संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, ॲड रविंद्र पाटिल, माजी आ. अरूण पाटिल यांची उपस्थिती होती.
बस स्टँड समोरील दुर्गा माता मंदिरात दुर्गा मातेचे दर्शन घेऊन आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ‘रोड शो’ची सुरूवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ‘रोड शो’ द्वारे प्रचार करण्यात आला. यावेळी या ‘रोड शो’ ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत आणि माता भगिनींनी औक्षण करत खा.अमोल कोल्हे आणि पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी संसदरत्न खा. अमोल कोल्हे यांनी मतदारांशी संवाद साधताना, गेल्या निवडणुकीत शरद पवार आदेशाने विद्यमान लोकप्रतिनिधीसाठी मतदान मागायला बोदवड येथे आलो होतो तुम्ही त्यांना विजयीसुद्धा केले परंतु ज्या शरद पवार साहेबांच्या नावावर ते निवडून आले त्यांची चार दिवसात त्यांनी साथ सोडली. त्यानंतर उध्दव ठाकरे साहेबांची साथ सोडत शिंदे गटात गेले. जो व्यक्ती आपल्याला मोठे करणाऱ्यांची साथ सोडतो, तो सामान्य जनतेला काय साथ देणार? असा प्रश्न उपस्थित करत याउलट मागील निवडणुकीत पराभव होऊनसुद्धा रोहिणी खडसे या सदैव जनतेच्या सेवेत कार्यमग्न राहिल्या. जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली त्यांनाच आता आपले लोकप्रतिनिधी बनवा. असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
यावेळी बोलतांना रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेल्या तीस वर्षापासून सर्वसमावेशक राजकारण करत नाथाभाऊंनी या परिसराचा विकास केला. अनेक विकास कामे केली, त्यांचा हा विकासाचा आणि जनसेवेचा वारसा पुढे चालविण्यासाठी मी आपली प्रतिनिधी म्हणून उभी आहे. आपल्या मतरुपी आशिर्वादाने माझ्यासोबत केवळ आपलाच नाही तर मतदारसंघाच्या विकासाचा, जातीय सलोख्याचा, शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणाचा विजय होणार आहे, असेही त्या म्हणाल्या. यानंतर रवींद्रभैया पाटील आणि अरूण पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, उच्चशिक्षीत व सुसंस्कृत उमेदवार रोहिणी खडसे यांना आपली बहुमुल्य मते देवून विजयी करण्याचं आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.