राज्यभरात आचारसंहिता लागू, एकाच टप्प्यात होणार निवडणुका
नवी दिल्ली (वृत्तसेवा) :- केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबरला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली. आम्ही नुकताच महाराष्ट्र आणि झारखंड येथील दौरा केला. तेथील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. येथील माहिती जाणून घेतली.(केएसएन) महाराष्ट्र राज्यात ९ कोटी ५८ लाख मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ४ कोटी ६६ लाख महिला, महिला ४ कोटी ६४ लाख, तृतीयपंथी ५६ हजार असे मतदार आहेत. राज्यभरात १८६ मतदान केंद्र आहेत. दिनांक २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.
वय वर्ष ८५ वरील जेष्ठ नागरिकांना राहत्या घरून मतदान करता येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. पूर्ण मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. राज्यभरात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. अर्ज २२ ऑक्टोबर पासून घेण्यास सुरुवात होणार आहे. (केएसएन)अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर राहील. अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे.
दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पक्षांची आता एकच धावपळ उडाली असून पक्षांचे चिन्ह आणि पक्षांच्या नेत्यांचे बॅनर खाली घेण्यासाठी आता सुरुवात करण्यात आली आहे.