जळगाव (प्रतिनिधी) :- ज्या प्रमाणे फळाशिवाय असलेल्या वृक्षाला पक्षी सोडून जातात त्या प्रमाणे पुण्यकर्म क्षीण असलेल्या अथवा पुण्य नसलेल्या व्यक्तीस भोग सत्ता, संपत्ती सोडून जातात. पुण्यामुळे मिळालेली अनुकूलता, समृद्धी ही भोगासाठी नव्हे तर मोक्षासाठी उपयोगी आणावी. आपले हात हे देणाऱ्या हातांच्या यादीत असावेत असे मोलाचे विचार व्यक्त केले शासनदीपक परमपुज्य सुमितमुनीजी महाराज यांनी.
परमार्थ धन, घामाची कमाई, उदारता, लज्जा आणि भाव सरलता या पाच महत्त्वाच्या गोष्टींबाबत काही दिवसांपासून प्रवचनात सविस्तर चर्चा व विश्लेषण सुरू आहे. आपण परोपकार कधी केला? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. या विश्वात पशु देखील जगतात. मानव देखील आपले जीवन जगत असतो. दोहोंच्या जगण्यात फरक नक्कीच आहे. जी व्यक्ती धर्म, दान, सत्कार्य करत नाही ती व्यक्ती पशूच असते. भलाईचे कार्य आपल्या हातून व्हायला हवे. दुसऱ्यासाठी केलेले परमार्थी कार्य हे आपल्याला आनंद देणारे असते आणि पुण्य वाढविणारे असते. आपल्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना उत्तम संस्कार द्यावे.
आज काल अर्थ ला वाजविपेक्षा अधिक महत्त्व दिल्या गेल्याने अनर्थ मात्र घडत आहे. धर्म टिकला तर परोपकार भावना आपल्यात रुजू शकेल. त्यामुळे आपले हात हे देणाऱ्या हातांच्या यादीत असावेत असे आवाहन केले. पाऊस पडल्यावर सृष्टी बदलते आणि वितराग पाऊस पडल्यावर दृष्टी बदलते. धर्म दलाली करून आपण पुण्याचे वाटेकरी होऊ शकतो. मिळालेला जन्म हा भोगासाठी नव्हे तर मोक्षप्राप्तीसाठी मिळालेला आहे असे परमपुज्य भुतीप्रज्ञजी महाराज यांनी प्रवचनात सांगितले.