जळगाव तालुक्यातील कानळदा जवळची घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कानळदा येथे घरी परतत असताना गिरणा नदीतून पायवाट काढीत जात असलेल्या शेतकऱ्याचा पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये सापडून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली होती. त्यांचा मृतदेह आज दि. ३ रोजी मिळून आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जितेंद्र शांताराम बाविस्कर (वय ३१ रां.कानळदा ता. जळगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील मोठा भाऊ असा परिवार आहे. (केसीएन)घरातील ते कर्ता पुरुष होते. शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान बुधवारी दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते दोनगाव शिवारात असलेल्या शेतातून काम आटोपल्याने घरी जात होते. वाटेत गिरणा नदीतून मार्ग काढत घरी जावे लागते. नदीतून घरी जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह आला व त्यातच शेतकरी जितेंद्र बाविस्कर हे वाहून गेले. ग्रामस्थांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस पाटील नारायण पाटील यांच्याकडून जळगाव तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. संध्याकाळी उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. पण मिळून आला नव्हता. (केसीएन)अखेर गुरुवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कानळदा ग्रामस्थांना जितेंद्रचा मृतदेह आढळून आला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला असता येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.(केसीएन)दरम्यान गरीब परिवारातील व मनमिळावू स्वभावाचा जितेंद्र बाविस्कर हा तरुण शेतकरी मयत झाल्याने कानळदा येथे शोककळा पसरली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.