जळगाव तालुक्यातील कठोरा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातून गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा एका विहिरीत मृतदेह सापडला आहे. ही घटना शनिवारी १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धनीश कुंवरसिंग चौहान (१५, रा. लखनपूर, जि. बडवाणी, ह.मु. कठोरा, ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. मध्यप्रदेशातील चौहान कुटुंब कामानिमित्त कठोरा येथे राहते. (केसीएन)या कुटुंबातील धनीश हा मुलगा ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी कठोरा येथील भरत मुरलीधर जाधव यांच्या शेतातील विहिरीत एका मुलाचा मृतदेह असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ अनिल फेगडे, किरण आगोणे, दीपक चौधरी व अन्य सहकारी पोहचले. धनीश चौहान हा मुलगा हरविल्याची नोंद असल्याने त्याचे वडील कुंवरसिंग चौहान यांना बोलविण्यात आले. (केसीएन)त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर हा मृतदेह धनीशचाच असल्याचे त्यांनी ओळखले. हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.