यावल (प्रतिनिधी ) :- यावल तालुक्यातील मालोद या गावातील माहेर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेने ठिबक नळीची कंपनी टाकण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने तिचा पतीसह पाच जणांनी छळ केला. पैसे न आणल्याने विवाहितेला माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मालोद, ता.यावल येथील माहेर असलेल्या सुमय्या वसीम तडवी (23) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह मार्च 2020 मध्ये वडगाव, ता.रावेर येथील रहिवाशी वसीम करीम तडवी याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर पती वसीम तडवी, दीर शरीफ तडवी, सासू मरियम तडवी, झुबेदा इस्माईल तडवी व अंजुम इस्माईल तडवी या पाच जणांनी विवाहितेच्या पतीला ठिबक नळीची कंपनी टाकायची आहे म्हणून तिने माहेरून दोन लाख रुपये आणावे याकरिता त्रास दिला. शारीरिक आणि मानसिक छळ केला. पैसे न दिल्याने उपाशी पोटी ठेवून तिला माहेरी पाठवून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विवाहितेचा छळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.