जळगाव परिमंडळात वीजग्राहकांचा प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणने अभय योजना-२०२४ सुरु केली आहे. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलात योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजीपासून ही योजना सुरू झाली. मागील केवळ दहा दिवसांच्याच कालावधीत परिमंडलातील ३८५ ग्राहकांनी २४ लाख ९१ हजार रुपयांचा भरणा करून योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेमुळे ३८५ वीज ग्राहकांचे व्याज आणि विलंब आकारांचे एकूण ६ लाख २५ हजार रूपये माफ झाले आहेत.
कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. योजनेत थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे. योजनेनुसार पूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतच सहभाग घेता येणार आहे.
योजनेनुसार देय रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट असणार आहे. एकरकमी अथवा एकूण वीजबिलाच्या ३० टक्के रक्कमेचा भरणा केल्यास नवीन जोडणी अथवा पुनर्जोडणी घेण्याची तत्काळ संधी उपलब्ध आहे. एकरकमी अथवा देय वीजबिलाचा ३० टक्के रक्कम भरून व्याजमुक्त सहा हप्ते भरण्याची सोयही योजनेत उपलब्ध आहे.
जळगाव परिमंडलात मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी अभय योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी करण्याच्या सुचना यंत्रणेस दिल्या आहेत. त्यानुसार केवळ १० दिवसांत जळगाव जिल्हयातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या २०० ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदवत ११ लाख ६५ हजार ४० रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. धुळे जिल्ह्यातून ९७ ग्राहकांनी ६ लाख ५९ हजार २१० रुपयांचा तर नंदुरबार जिल्ह्यातून ६१ ग्राहकांनी ५ लाख ६८ हजार ८० रुपयांचा एकरकमी वीजबिल भरणा केला आहे. ३० टक्के वीजबिल भरुन हप्त्याने थकबाकी भरण्याचा लाभ घेणारे २७ ग्राहक परिमंडलात आहेत. त्यातील धुळ्याचे ६, जळगावचे १४ तर नंदुरबार जिल्ह्यातील ७ ग्राहक आहेत. या २७ ग्राहकांनी ९८ हजार ८४० रुपयांचा वीजबिल भरणा केला आहे.
जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असलातरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी ही योजना मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.