पोलीस स्टेशन, रुग्णालयातही जाऊन धमकावले : जळगावातील धक्कादायक प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : हिस्सेवाट्यावरून भावंडांमध्ये सुरू असलेल्या वादातून औद्योगिक वसाहत परिसरातील व्ही सेक्टरमधील शक्ती प्लास्टिक इंडस्ट्रीज या कंपनीत २० ते २५ जणांनी जाऊन काम करणाऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली. तक्रार देण्यासाठी जखमी व्यक्ती पोलिस ठाण्यात आले असता पोलिस ठाण्यासमोरदेखील टोळक्याने त्यांना मारहाण केली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घडण्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
मुंबई येथील अनिल मुन्शी विश्वकर्मा यांच्या मालकीची शक्ती प्लास्टिक नावाने कंपनी आहे. कंपनीत कामगार काम करीत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कमलेश विश्वकर्मा हे २० ते २५ जणांच्या टोळक्याला सोबत घेऊन कंपनीत शिरले. त्यांनी कंपनीतील साहित्याची तोडफोड करीत मारहाण करण्यास सुरुवात केली, असे अनिल विश्वकर्मा यांनी सांगितले. कामगार त्यांना टोळक्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी गेले असता, टोळक्याने कामगारांनादेखील बेदम मारहाण करीत त्यांच्यावर तलवार व चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले.
या मारहाणीत अनिल मुन्शी विश्वकर्मा (४४, रा. मुंबई), नवनीत प्रल्हाद माहोरे (२२, रा. अमरावती, ह. मु, एमआयडीसी), राजू तुळशीराम विश्वकर्मा (४०) व सत्वनसिंग दीपकसिंग बावरी (३५) हे गंभीर जखमी झाले. राजू विश्वकर्मा यांचा कान कापला गेला असून नवनीत यांच्या डोक्यावरदेखील वार झाले आहेत. टोळक्याने हल्ला केल्यानंतर जखमींना घेऊन महिला कर्मचारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गेल्या. यावेळी टोळक्याने पोलिस ठाण्याबाहेर उभ्या असलेल्या महिलेला मारहाण केली.
पोलिस तेथे पोहोचले असता टोळके पसार झाले. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू होते. तेथे येऊनही टोळक्याने जखमींना दमदाटी केल्याची माहिती अनिल विश्वकर्मा यांनी दिली. गेल्या काही महिन्यांमध्ये अनिल विश्वकर्मा यांनी एमआयडीसी पोलिसात चार वेळा तक्रार दिली, त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या टोळक्यातील दोन ते तीन जणांनी गुरुवारी कंपनीत येऊन विश्वकर्मा यांना कंपनी खाली करण्यासाठी धमकी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी टोळक्याने कंपनीत तोडफोड करून कामगारांवर हल्ला केला.