जळगाव शहराची पाण्याची चिंता मिटली
जळगाव (प्रतिनिधी) : वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे यंदा वाघूर धरण १०० टक्के पूर्ण भरले आहे. त्यामुळे जळगावकरांची दोन वर्ष पाण्याची चिंता मिटली आहे. हिंदू संस्कृतीची जपणूक करीत कृतज्ञता म्हणून आमदार सुरेश भोळे व त्यांच्या पत्नी तथा माजी महापौर सीमा भोळे यांनी वाघूर धरणावर जाऊन जलपूजन केले. धरणस्थळी साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण केला.
यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अभियंता पी. एम. पाटील, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले, सहाय्यक अभियंता विशाल सुर्वे, तापी पाटबंधारे सहाय्यक अभियंता अजय जाधव यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होता. वाघूर धरण यापुढेही सदैव १०० टक्के भरून या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या जळगाव शहरासह जामनेर, भुसावळ तसेच अन्य परिसरातील गावांना लाभ मिळू द्यावा व सर्वत्र सुख- समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली.
वाघूर धरणाचे बांधकाम १९७८ मध्ये झाले असून, तेव्हापासून आतापर्यंत ते चार वेळा १०० टक्के भरले आहे. पुढील दोन वर्षांसाठी जळगाव शहराच्या जलसाठ्यात भर पडली असून, नागरिकांची जलचिंताही मिटली आहे.