मुंबईतील जखमींपैकी दोघे उद्या भुसावळला घरी परतणार
जळगाव (विशेष वृत्त) : नेपाळ बस दुर्घटनेतील काठमांडू येथील उपचार घेत असलेल्या ९ पैकी २ जणांना बुधवारी दि. २८ रोजी रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले आहे. तर मुंबईत दाखल ७ जखमींपैकी दोन जण उद्या दि. २९ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत भुसावळ शहरात घरी सुखरूप परतणार आहे.
नेपाळ देशात देव दर्शनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांच्या बसला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात २७ जण मृत्युमुखी पडले होते. तर १६ जण जखमी होते. या १६ पैकी ७ जखमींना काठमांडू येथून मुंबई येथे विशेष विमानाने पुढील उपचारासाठी सोमवारी दि. २६ रोजी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बॉंबे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. (केसीएन) दरम्यान या ७ जणांपैकी भारती पाटील (भुसावळ) आणि हेमराज राजाराम सरोदे (वरणगाव) हे दोघे भाविक मुंबईतून रेल्वेत बसले असून ते सकाळी भुसावळ येथे आपल्या घरी सुखरूप परतणार आहेत. तर इतर ५ जखमींपैकी वरणगाव येथील वर्षा पंकज भंगाळे, कुमुदिनी झांबरे, रूपाली हेमराज सरोदे, नीलिमा भिरुड तर भुसावळ येथील सुनील धांडे हे मुंबईत उपचार घेत आहेत.
दुसरीकडे, नेपाळ देशातील काठमांडू येथे उपचार घेणाऱ्या ९ पैकी अविनाश भागवत पाटील (वय ४८, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) आणि शारदा सुनील पाटील (वय ५०, रा. आचेगाव ता. भुसावळ) हे जखमी भाविक बुधवारी २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजेला पोचले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. (केसीएन)तर अपघातातील उर्वरित जखमी सीमा इंगळे,आशा पांडुरंग पाटील, प्रवीण पांडुरंग पाटील, अनंत इंगळे यांच्यावर जनरल कक्षात तर रेखा प्रकाश कोळी, ज्ञानेश्वर बोंडे, आशा बोन्डे यांच्यावर अतिदक्षता विभागात काठमांडूत उपचार सुरु आहेत. जनरल कक्षात असलेले चार भाविक हे गुरुवारी काठमांडू येथून वैद्यकीय सल्ल्याने मुंबईत येऊ शकतात अशी माहिती प्राप्त झाली आहे.