शहरातील तुकाराम महाराज नगरात अश्रूंचा महापूर
भुसावळ (प्रतिनिधी) : नेपाळमधील मार्त्यांगडी नदीत बस कोसळून २७ जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेत भुसावळ येथील तुकाराम महाराज नगरातील भारंबे कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात आई, मुलगा, सून आणि चार वर्षांची मुलगी परी असे एकाच कुटुंबातील चार जण ठार झाले आहेत. आता घरात कुणीही उरलेले नाही. त्यामुळे तुकाराम महाराज नगरात शनिवारी रात्री जेव्हा मृतदेह आले तेव्हा नातेवाईकांसह नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
गणेश भारंबे (वय ३२) हे भुसावळच्या तुकाराम महाराज नगरात राहतात. ते रेल्वेत कंत्राटी कर्मचारी होते. गणेश यांच्यासह त्यांच्या आई सुलभा भारंबे (६१), पत्नी योगिनी भारंबे (२५), मुलगी परी (६) असे चौघेजण नेपाळमध्ये गेले होते. (प्रतिनिधी) तीन बसपैकी एका बसमधून ते पशुपतिनाथकडे दर्शनाला निघाले होते. वाटेतच ही बस नदीत कोसळली आणि २७ जणांचा जीव गेला.
त्यात भुसावळच्या गणेश भारंबे यांच्यासह कुटुंबीयांचाही समावेश होता. गणेश भारंबे यांनी गेल्या वर्षी पायी नर्मदा परिक्रमा केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते पायी पंढरपूर वारी करीत होते. त्यांच्या आई सुलभा भारंबे ह्या मुक्ताईनगर येथे महावितरणमधून निवृत्त झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वीच योगिनी भारंबे यांचा वाढदिवस नेपाळमध्ये साजरा केला होता आणि त्याच वेळी गणेश यांनी भुसावळात राहणारा मावसभाऊ वर्धन राणे यांना फोन करून आमचा प्रवास सुखरूप सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र शुक्रवारी त्यांची बसच्या अपघाताचीच बातमी घेऊन धडकली.