भडगाव तालुक्यातील कोठली येथील शेतकऱ्यांची तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कोठली येथील महावितरण कंपनीने १३२/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या बाजूला तणनाशकाची फवारणी केल्याने शेतातील संपूर्ण कापसाचे पीक खराब झाले आहे. या घटनेबाबत तालुका कृषी अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत नुकसानीचे पंचनामे शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता केले असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.
संपूर्ण कापसाचे पीक खराब झाल्याप्रकरणी तातडीने पीक नुकसानीचा पंचनामा करावा व तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तालुक्यातील कोठली येथील रवींद्र पाटील व ताराचंद पाटील यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दाखल घेत पंचनामे शनिवारी करण्यात आले आहे. पंचनामा करतेवेळी तालुका कृषी अधिकारी परेश बागले, मंडळ कृषी अधिकारी पि.एन.खाडे, तलाठी पि.ए हस्तकारे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आय.बी देशमुख, कृषी सहायक एच.एस देवरे, संबंधित शेतकरी रविंद्र दौलत पाटील, ताराचंद शिवाजी पाटील व परिसरातील शेतकरी हजर होते.