कल्याणकारी योजनेचा समावेश
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील भुसावळ विभागाने आज दि. ९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बँकेसोबत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा विभागाने केलेला अत्यंत प्रशंसनीय उपक्रम आहे. या करारात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणकारी योजनांचा विशेषतः विचार करण्यात आला आहे.
मंडल रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र बँकेचे जलगाव, क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण कुमार सिंह यांच्या अथक प्रयत्नांमुळे भुसावळ विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हा कल्याणकारी ऐतिहासिक करार साकार झाला आहे. प्रसंगी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक आर. के. यादव, मंडल रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मुकेश कुमार मीना, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. एस. काझी आदी अधिकारीगण आणि तसेच महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण कुमार सिंह व इतर अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही. एस. वडनेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्मिक विभाग, इंजिनीअरिंग विभाग, एस. अँड टी. विभाग, संरक्षा विभाग, सुरक्षा विभाग, वीज विभाग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. एस. काझी यांनी केले.
कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध लाभ खालीलप्रमाणे
– गोल्डन आवर: रु. १ लाखाचे जीवनरक्षक कॅशलेस उपचार
– वैयक्तिक अपघात विमा: रु. ४० लाखांपासून रु. १ कोटीपर्यंत, कोणत्याही प्रीमियमशिवाय
– वैयक्तिक अपघात विमा/डेबिट कार्डसह रु. २ लाख ते १० लाखांपर्यंत
– भारतीय रेल्वेचे कायमस्वरूपी कर्मचारी शून्य शिल्लक असलेले जीवनसाथीच्या नावाने संयुक्त खाते उघडू शकतात
– एटीएम/डेबिट कार्डद्वारे व्यवहार मर्यादा रु. दीड लाख प्रतिदिन
– २४ तास, ७ दिवस फ्री मोबाईल/इंटरनेट बँकिंगद्वारे NEFT/RTGS सेवा
– कर्जासह क्रेडिट लाईफ विमा कवच, ज्यामुळे कर्जदाराच्या मृत्यूनंतर संपूर्ण कर्जाची रक्कम कव्हर होईल (गृह, कार, शिक्षण आणि वैयक्तिक कर्जासाठी)
– शिक्षण कर्ज रु. ४० लाखांपर्यंत, ८. १०% पासून सुरू होणाऱ्या सर्वात कमी व्याज दरासह, १५ वर्षांपर्यंत परतफेड करता येते