जळगाव जिल्ह्यातील ६ प्रकरणे अपात्र तर २ प्रस्ताव फेरचौकशीसाठी रवाना
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकरी आत्महत्या समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रशासन पातळीवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून २५ अनुदान मदत प्रस्ताव सादर झाले होते. त्यापैकी १७ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली तर ६ मदत प्रस्ताव अपात्र असल्याने फेटाळण्यात आले असून २ प्रकरणे फेरचौकशीसाठी तालुकास्तरावर पाठविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत मेहूचे ज्ञानेश्वर रामचंद्र पाटील, हिरालाल जालम पाटील, अर्जुन सुकदेव पाटील म्हसवे, राजू राघो पाटील शिरसमणी, गणेश प्रकाश सैंदाणे ता. पारोळा, भरत तुकाराम धनगर भोरटेक, दीपक आत्माराम पाटील मळगाव ता. भडगाव, योगेश रामधन पाटील रोटवद, बापू रामदास गावंडे माळपिंप्री, श्रवण सुरेश पाटील गणेशपूर, महेंद्र संतोष देवरे भारूडखेडा, प्रकाश शंकर बारी पहूर ता. जामनेर, मगन धर्मा चव्हाण चतुर्भूज, आबा विक्रम पवार. टाकळी प्र.ता.चाळीसगाव, शशिकांत पृथ्वीराज पाटील खडकदेवळा ता. पाचोरा अशा आत्महत्या केलेल्या १७ शेतकरी कुटुंबियांच्या मदत प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती तथा बैठकीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समिती सदस्य आदी उपस्थित होते.