जळगावात वाणी विद्यामंदिरात विद्यार्थ्यांशी साधला संवाद
जळगाव (प्रतिनिधी) : कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव या विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना अंतर्गत विस्तार अधिकारी खलील शेख आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनाचे अधीक्षक विजय पवार या मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.
शालेय प्रशासनातर्फे मुख्याध्यापक डॉ. रवीन्द्र माळी यांनी स्वागत केले. सदर उपक्रमात शाळेतील इ.१ ली ते ४ थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील रुपाली निकुंभ, खिलेश्वरी हिवराळे, हर्षवर्धन देवरे व तेजल पवार, कृतिका करोशिया, श्रेयस पांचाळ, राजरत्न पारधे इ.विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात विद्यार्थ्यांना योजनेचे महत्त्व, आहाराची गुणवत्ता व चव तसेच शालेय परिसरातील स्वच्छता इ.मुद्दे मांडले.
तद्नंतर खलील शेख यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज साधतांना आहाराचे जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे विजय पवार यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.(केएएन)शासनाच्या योजनेचा परिपूर्ण लाभ प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रयत्नपूर्वक देण्यात यावा असे आवाहन केले. उपक्रमाच्या शेवटी खलील शेख व विजय पवार यांनी सर्व विद्यार्थ्यांसह आज शनिवार रोजीचा आहाराचा पदार्थ मसालेदार खिचडी व जिलेबी यांचा आस्वाद स्नेहभोजनात घेतला.
साहेब आपल्या शाळेत आपल्या शेजारी बसून जेवले याचा सर्वच विद्यार्थ्यांना अत्यानंद झाला. विद्यार्थ्यांनी मनसोक्त स्नेहभोजनाचा आनंद घेतला. सूत्रसंचालन नरेंद्र वारके यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शालेय पोषण आहार योजना कर्मचारी यांनी सहकार्य केले.