सार्वजनिक आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील म्हसावद येथील ४१ वर्षांपासून जुने असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोमवारी दि.१ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे त्याची वाताहात होऊन यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्णाची हेळसांड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने या आरोग्य केंद्राचे नुकसान झाले असून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. दरम्यान दुसरीकडे म्हसावदचे केंद्र हे ग्रामीण रुग्णालय करणे बाबत सहा वर्षांपूर्वी आदेश असूनही अद्यापही त्याबाबत कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही.
तालुक्यातील म्हसावद येथे जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. रुग्णांना तसेच कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सोय उपलब्ध नसून यामुळे रुग्णांची परवड होत आहे. इमारत पूर्णपणे गळती झाली असून तेथील कागदपत्रे, रेकॉर्डरूम इत्यादी सर्व वस्तू बॅनर तसेच प्लास्टिक आवरणाने झाकण्यात आले आहे.याबाबत वरिष्ठांकडे सूचना ,तक्रार देऊन देखील काहीही उपयोग झालेला दिसत नाही . या प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत २६ गावे असून ६० हजार लोकसंख्या या केंद्राअंतर्गत येते. तसेच ७ उपकेंद्र याच्या अख्यातरित आहेत.
सोमवारी दि. १ जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे तर आरोग्य केंद्राची मोठी वाताहत झाली. कर्मचाऱ्यांसह नागरिकांना धावपळ करून आरोग्य केंद्रामध्ये डागडूजी करावी लागली. मात्र ही डागडुजी पुढील पावसामध्ये पुन्हा निघून जाणार आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. २२ मार्च २०१८ रोजी स्वतंत्र आदेश काढून म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी आदेश काढला होता. त्यात ३० खाटा क्षमतेची मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच म्हसावदचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य विभागाने दि. २१ सप्टेंबर २०१९ रोजी नवीन आदेश काढून शिरसोली प्र. न. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. शिरसोली प्र. न. येथे आरोग्य केंद्रासाठी निधीदेखील आलेला आहे. मात्र याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही कुठलीच झालेली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी केलेली आहे.