जामनेर तालुक्यातील वाकडी येथील हत्याप्रकरणाचा उलगडा !
एलसीबीच्या पथकाला ५ दिवसानंतर यश
जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाकडी येथे शनिवारी दि. ११ मे रोजी एका ९० वर्ष वृद्ध महिलेचा राहत्या घरात मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. दरम्यान, ही घटना अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसाठी झाली असावी असे चित्र दिसून येत होते. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अर्थात एलसीबीच्या पथकाने कसून तपास करीत अखेर पाच दिवसानंतर यश मिळविले आहे. ९० वर्षीय आईला मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपोटी मुलाने तिला जबर मारहाण केल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासामध्ये स्पष्ट दिसून आले आहे. मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
राधाबाई भालचंद परदेशी (वय ९०, रा. वाकडी ता. जामनेर) असे मयत वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. गावात त्या एकट्याच राहत होत्या. काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष (वय ६५) हे परिवारासह राहतात. तर दोन मुलींची लग्न झालेली आहेत. शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून त्या ११ ते सव्वा ११ वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने खून केला होता. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला होता.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनसह एलसीबीचे पथक तपासासाठी कामाला लागले होते. त्यांनी घटनेप्रकरणी एकेक धागा जोडून त्याचा तपास केला. मात्र तपास लागत नव्हता. अखेर पाच दिवसानंतर एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या पथकाला यश आले. त्यांनी मयत राधाबाई यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी (वय ६५, रा. वाकडी ता. जामनेर) यालाच अटक केली. त्याला याबाबत जाब विचारला असता त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुभाष परदेशी याचे वडील अर्थात मयत राधाबाई यांचे पती भालचंद्र परदेशी हे शिक्षक होते.
निवृत्त झाल्यावर त्यांना पेन्शन सुरू होती. भालचंद्र परदेशी हे वारल्यानंतर ती पेन्शन राधाबाई यांना सुरू होती. दरवेळेला एकत्र तीन महिन्याची पेन्शन घेण्यासाठी राधाबाई यांच्यासोबत मुलगा सुभाष हा जायचा. पेन्शनच्या रकमेमधून चार पाच हजार रुपये आई राधाबाई हिला देऊन बाकीचे सुभाष हाच ठेवून घ्यायचा. आता मात्र राधाबाईने पेन्शन घ्यायला स्वतः जायचा निर्णय घेतला व सुभाषला सोबत येण्यास नकार दिला होता. यामुळे सुभाषला आईच्या वागण्याचा राग आला होता.
त्या वागण्यातून शनिवारी त्याने आईसोबत वाद घातला आणि आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत आई राधाबाई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुभाष हा लगेच त्याच्या घरी निघून गेला. ५ दिवस तो पोलीस तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. मात्र गावातील काही सीसीटीव्ही फुटेज आणि नेहमी तो आईला त्रास दियाचा यामुळे सुभाष परदेशी याच्या वर्तनावरून पोलिसांना संशय आला आणि तिथेच खुनाची घटना उलगडली. तपास कामी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सपोनि गणेश फड, पोउनि गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, पोह महेश महाजन, लक्ष्मण पाटील, अकरम शेख, किशोर राठोड, विजय पाटील, रणजित जाधव, सचिन महाजन, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, भारत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकुर, अभिलाषा मनोरे, मंगला तायडे सर्व नेम. स्थागुशा जळगाव, पोह विनोद पाटील, मुकेश पाटील नेम. फत्तेपुर परिश्रम घेतले.