चाळीसगाव शहरात घडली घटना, जळगावच्या जोशी पेठेत शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जोशी पेठ येथील रहिवासी आणि महानगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी दि. १२ मे रोजी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. त्यातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जोशी पेठेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संजय भगवान चौधरी (वय ५३, रा.जोशी पेठ, जळगाव) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते जोशी पेठेत पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांच्यासह राहत होते. महानगरपालिका येथे गेल्या ३० वर्षापासून ते नोकरीला होते. सध्या वसुली विभागात त्यांना कर्तव्य देण्यात आले होते. दरम्यान जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना चाळीसगाव शहरातील तेहजीब उर्दू प्रायमरी स्कूल केंद्र क्रमांक १९१ या ठिकाणी त्यांना इलेक्शन ड्युटी देण्यात आली होती.
रविवारी दि. १२ मे रोजी रात्री ११ वाजेला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा जोरात झटका आला. रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. सोमवारी दि.१३ मे रोजी सकाळी त्यांचा मृतदेह जळगावला आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू झाल्यामुळे जोशी पेठेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.