जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घटना
जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील एका ५९ वर्षीय प्रौढाने दि. १ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दिली आहे. ते गावात त्यांच्या परिवारासह राहतात. चोपडा तालुक्यात चौगाव येथील कैलास पाटील या दलालाच्या मध्यस्थीतून तक्रारदाराच्या मुलासाठी मध्यप्रदेशातील एका तरुणीचे स्थळ आले. दोघांचा विवाह पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथे तुळजा भवानी मंदिर येथे १२ नोव्हेंबर रोजी विवाह लावला. यानंतर वेळोवेळी रोख रक्कम व दागिने मिळून २ ते अडीच लाख रुपये तक्रारदाराच्या मुलाने नवरी व तिच्या नातेवाईकांना दिले आहे.
सदरहू नवरी हि विवाह झाल्यावर अडीच महिने नांदली आहे. नांदताना नवरीने घरातील सर्व कामे केली. आपुलकीने वागली. त्यानंतर ७ जानेवारी रोजी भावाच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम असल्याचे सांगून दोघेही तक्रारदारासह पती पत्नी हे चोपडा येथे गेले. त्यानंतर संशयित रामसिंग पावरा हा दुचाकी घेऊन आला. मी पुतणीला घेऊन पुढे जातो, तुम्ही दोघे दुसऱ्या दुचाकीने या म्हणत ते निघून गेले. नंतर तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना सेंधवा तालुक्यातून नवरी व तिचा बनावट काका यांनी दोघांना गुंगारा देऊन पळ काढला आहे.
त्यानंतर याबाबत संपर्क करण्यासाठी संबंधित संशयित यांना फोन केले असता फोन बंद झाले आहे. त्यामुळे मुली न मिळण्याच्या लाचारीपोटी दलाली घेऊन लाखो रुपये घेऊन बोगस विवाह लावून तरुणांची फसवणूक करणारी टोळी असल्याबाबत तक्रारदार प्रौढांने तक्रार अर्जात म्हटले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी कैलास पाटील (रा. चौगाव ता. चोपडा) या दलालासह नवरी निर्मला पावरा, सुभराम पावरा, दिलीप पावरा, रामसिंग पावरा, कालू पावरा व आणखी एक (सर्व रा. मध्यप्रदेश) यांच्याविरोधात तक्रार अर्ज दि. १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला देण्यात आला आहे.
मात्र अद्यापही याबाबत कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच पोलिसांनी पुढील काहीही कारवाई संशयित आरोपींवर केलेली नाही. त्यामुळे याबाबत आता वरिष्ठांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे तक्रारदारांनी म्हटले आहे.