लोकसभेसाठी १० लाखांपेक्षा अधिक मतांचे “टार्गेट”
जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडीकडून शिवसेना (उबाठा) गटाकडून उमेदवार चाचपणी सुरु आहे. त्याकरिता त्यांचे ‘सेनापती’ संपर्कप्रमुख संजय सावंत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी स्वतःच्या पक्षासह मित्रपक्षांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे. याबाबत “केसरीराज” ने संजय सावंत यांच्याशी अनेक मुद्द्यांवर जाणून घेत चर्चा केली. निवडणुकीत कशा प्रकारे व्यूहरचना केली जाणार आहे, तसेच निवडून येण्यासाठी उमेदवाराला लागणारी विविध प्रकारची मदत याबाबत नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. लढाई लढण्याआधी सैन्याला बळ द्यावे लागते. त्यांचा आत्मविश्वास किती आहे याची पाहणी करावी लागते. त्यानुसार आता ग्राउंड लेव्हलपासून शिवसेनेची तयारी ‘सेनापती’ करून घेत आहे. आणखी दौरे करून ते जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांना सातत्याने मार्गदर्शन करून व्यूहरचना समजावून सांगणार आहेत.
मविआचा उमेदवार अद्यापही सस्पेन्स का ? याबाबत अनेकांना कोडे पडले आहे. भाजपमध्ये उमेदवार जाहीर असला तरी प्रचंड अस्वस्थता आहे. विरोधी उमेदवार कोण राहील याकडे भाजप नेत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यानुसार स्मिता वाघ यांना कायम ठेवावे कि उमेदवार बदलवावा याबाबत भाजपची रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर करण्याआधी मविआचे मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व काँग्रेस पक्षाशी संजय सावंत यांनी चर्चा करीत उमेदवार कोण असला पाहिजे याबाबत माहिती घेतली.
सध्या मविआकडे कुलभूषण पाटील, ललिता पाटील यांच्यासह चाळीसगाव येथील दूध संघातील प्रमोद पाटील यासह सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ या पर्यायांवर चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येण्याकरिता आज हक्काची असलेली चार लाख मते तरी मविआने अपेक्षित धरली आहे. यापेक्षा अधिक मते मिळविण्याकरिता कष्ट घ्यावे लागणार आहे. यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यातूनच ठाकरे गटाला आणखी ५ ते ६ लाख मते अपेक्षित आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाखापेक्षा अधिक मतदार आहे. त्यामुळे संजय सावंत यांची मित्रपक्षासहित व्यूहरचना मजबूत झाली कि त्यानंतर उमेदवार घोषित होईल अशी चिन्हे आहे.