पाचोरा तालुक्यात पंचनामे सुरु
पाचोरा (प्रतिनिधी) – सातगाव परिसरात नुकत्याच झालेल्या अति पावसाने बामणी नदीला पूर आला. पुरामुळे दोन्ही किनाऱ्यांवरील गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सातगाव परिसरात झालेल्या अति पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीँ सहायक व तलाठी यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या अति पावसाने पिकांसह मातीही खरडून निघाली आहे. बामणी नदीच्या दोन्ही तीरांवर असलेली शेते उद्ध्वस्त झाली आहेत. कृषी सहायक सुनील साळवे आणि तलाठी उमेश पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरु केले आहेत.
गेल्या जूनपासून ठिबक सिंचनासारख्या पडणाऱ्या पावसावर कपाशीचे पीक वाढवले; मात्र एका रात्रीत अति पावसाने पीक वाया गेले. मागील वर्षीही नुकसानीचे पंचनामे होऊन मदत मिळाली नाही. आता लवकरात लवकरच नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.