विवाहितेचा गळफास, जळगावातील श्रीराम नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगरात राहणाऱ्या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैशाली विजय सोनार (वय-२८, रा. श्रीराम नगर जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. शहरातील जूना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते चहा विक्री करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. सोमवारी २५ सप्टेंबर रोजी विजय सोनार हे दुकानावर असतांना घरी एकट्याच असलेली त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी कुठल्यातरी नैराश्यातून गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे पती सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी गेले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.
पत्नीचा मृतदेह बघताच त्यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोहेकॉ प्रदीप नन्नवरे, रविंद्र बोदडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विवाहितेचा मृतदेह खाली उतरवून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.