नागरिकांच्या विजबिलात झाली कपात
जळगाव (प्रतिनिधी) – छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच एक लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकश चंद्र यांनी दिली.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली तर ती नेट मिटरिंगद्वारे महावितरणला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीजबिलही येते. राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १,०४,०३५ झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६५६ मेगावॅट इतकी झाली आहे. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे.
राज्यात २०१६ – १७ या आर्थिक वर्षात केवळ १,०७४ ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता २० मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणच्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली. २०१९ – २० या आर्थिक वर्षात अशा ग्राहकांची संख्या २६,०१७ झाली व एकूण क्षमता ५१२ मेगावॅटवर पोहोचली. दोनच वर्षात २०२१ -२२ या आर्थिक वर्षात या ग्राहकांची संख्या ५५,७९८ झाली व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,०१७ मेगावॅट झाली. २०२१ -२२ ते २०२१ -२२ या एका आर्थिक वर्षात रूफ टॉप सोलरद्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती क्षमतेत ४२१ मेगावॅटची भर पडली.
रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. महावितरण ग्राहकांना हे प्रकल्प बसविण्यासाठी मदत करते. महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.