•||• *महावीर वाणी २९* •||•
मनुष्य अनंत जीवांसोबत राहतो. आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, तितके दोष आत्माकडून होत असतात. कुणासोबतही नकळत आपल्या हातून चुकिचे वर्तन होते. ते आपल्याला आठवतसुद्धा नाही. जीवनातील चुकांचा स्वीकार केला पाहिजे. क्षमायाचना केली पाहिजे. तनबल, सत्ताबल, बुध्दीबल, धनबल याचा दुरपयोग केला तर आत्माच्या चार सदगुणांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. चारही बलांचा वापर करून सदुपयोग केला तर आनंदी आयुष्य जगता येते. क्षमा, सरलता, निरलोभता, निर्मलता हे चार आत्मगुण मनुष्याला सदगुणी बनवत असतात.
जीवनाला गणितासारखे बघितले पाहिजे. त्यानुसारच आचरण केले पाहिजे. भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ही गणिताची कोडी सोडविण्याच्या पद्धती आहेत. त्याचपद्धतीचा अवलंब करून मनुष्याला जीवन सूखी-समृद्ध करता येईल. आपल्यातील चांगुलपणा, चांगल्या गुणांचा गुणाकार करत राहिले पाहिजे. आपल्याकडून झालेल्या चुकांचा भागाकार करत रहावे, कुणाची निंदा, चुगली न करता त्याची वजाबाकी करत रहाणे. एकमेकांमधील सदगुणांची बेरीज करत राहणे. हे ज्याला जमले त्याला ‘जीवनाचे वर्गमुळ’ समजले, असेच म्हणावे लागेल.
चुक झाली असेल तर ‘मी हे काय केले’, असा विचार मनात आला तर आपल्या चुकांचा भागाकार झाला असे समजावे. त्यासाठी दु:खातही चांगले विचार ठेवा. स्वत:मधील वाईट प्रवृत्तींचा विवेकशीलपणे ‘संवर’ म्हणजे त्याग केला पाहिजे. क्रोध, मान, माया, लोभ यांचा ‘उपशम’ केला पाहिजे. आपले विचार दुसऱ्यांवर लादण्यासाठी परिवार, समाज यांच्यात विभाजन करू नये. जोपर्यंत पुण्यकाल आहे तोपर्यंत ते कामा येईल. मात्र पुण्यकाल समाप्त झाल्यानंतर ‘कर्मसत्ता’ आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे आपल्यावर कर्माचे ‘कर्ज’ आहे. त्याची सर्वांचे ‘दुश्मन’ असलेल्या ‘राग’ व ‘द्वेष’ याचा त्याग करून परतफेड करावी. प्रेम, सदभाव वाटणारा कधिही दु:खी होऊ शकत नाही. असे विचार प. पु. गुलाब मुनी म. सा. यांनी जळगाव येथील रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन येथे चातुर्मास प्रवचन श्रुंखलेदरम्यान व्यक्त केले. त्यात आज असंख्य श्रावक-श्राविकांची उपस्थितीत होते.
प. पू. कैलाश मुनी म.सा. यांनी ‘साथ हैं तो सुरक्षा है.’ असे सांगत ‘शेअरिंग’ भावनेवर प्रकाश टाकला. कुणाच्या घरात, समाजात, व्यक्तींच्या मनात अशांती निर्माण होईल, त्याची प्रसन्नता नाहिशी होईल, त्याला असमाधान वाटेल असे वर्तन करू नये. चांगेल विचार त्याच्यासोबत व्यक्त करावे. शरिराच्या प्रतिकूल काळातही मनोधैर्य खचू न देता धर्मआराधना करत राहणे. चांगल्या कर्मातून मनुष्य जीवनात शांती, प्रसन्नता, समाधान शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे विचार प. पू. कैलाश मुनी म.सा यांनी मांडले.
(स्वाध्याय भवन, जळगाव – दि. ३०/०७/२०२३)
_शब्दांकन – देवेंद्र पाटील, प्रसिद्धी विभाग जैन इरिगेशन. जळगाव._