राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुलगुरूंना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – खान्देशातील विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांत बीसीए, बीबीएच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील प्रवेश संख्येत वाढ करण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसतर्फे कुलगुरूंना गुरुवारी २७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्र संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष बीसीए, बीबीए वर्गाकडे विद्यार्थ्यांचा ओढा जागतिकीकरण व भविष्यातील नोकरीच्या संधी पाहून वाढलेला दिसत आहे. परंतु सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता मागणीच्या तुलनेत उपलब्ध जागांची कमतरता सातत्याने जाणवत आहेत. बऱ्याच गरीब, होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांना बीसीए, बीबीए या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची इच्छा असून देखील त्यांना प्रथम वर्ष वर्गात प्रवेश मिळत नाही. कारण यावर्षी बहुतेक महाविद्यालयांमधील बीसीए/बीबीए प्रथम वर्षाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत अधीकचे प्रवेश झालेले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करत असतानाच रोजगार निर्मितीच्या अंगाने शिक्षण घेणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांचा बीसीए,बीबीए अभ्यासक्रमाकडे वाढता कल पाहता, संबंधित महाविद्यालयात उपलब्ध जागांमध्ये किमान ४० टक्क्याने तत्काळ वाढ करावी. जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणे सोयीचे होईल, अशी मागणी निवेदनाने करण्यात आली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, विद्यार्थी काँग्रेसचे गौरव वाणी यांच्या सह्या आहेत.