शासनाने आता तरी जागे व्हावे : प्रवाशांची अपेक्षा
मुंबई (प्रतिनिधी) – समृद्धी महामार्गाने आणखी २५ बळी शनिवारी घेतले. बसच्या भीषण अपघातात पहाटे सिंदखेडराजा येथे प्रवाशांवर मरण ओढवले. आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर दरम्यान सुपरफास्ट प्रवासासाठी तयार केलेला समृद्धी महामार्ग हा वाहन चालकांसाठी खुनी मार्ग ठरत आहे. गेल्या ५ महिन्यात या महामार्गावर ९५ जणांचा विविध अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातांमागे ३३ टक्के महामार्ग संमोहनाचे कारण असल्याचा निष्कर्ष नागपुरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) विद्यार्थ्यांनी काढला आहे. आरटीओतील अधिकाऱ्यांनीही या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे.
मुंबई-नागपूर दरम्यानचा ७०१किमीचा १६ तासांचा रस्ते प्रवास ८ तासांवर आणण्यासाठी समुद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला हा महामार्ग १० जिल्ह्यांमधून जातो. या महामार्गातील नागपूर ते नाशिक हा ५२० किमीमार्गामुळे प्रवासी वेळेत बचत होत असली तरी, गेल्या ५ महिन्यात या मार्गावर १९५ लहान-मोठे अपघात झाले. त्यात ९५ जणांनी आपला जीव गमावला आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर वाहनांचा प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली. आऱटीओची कारवाई, दंड आकारणी, समुपदेशन करुन देखील अपघाताचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे नागपुरातील व्हीएनआयटीच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या वाहतूक विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरील शंभर किलोमीटरच्या टप्याचा तीन महिने अभ्यास केला. त्या अभ्यासातून महामार्ग संमोहनाचा निष्कर्ष काढला आहे.