बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा येथील घटनेत ७ बचावले
बुलढाणा (प्रतिनिधी) -नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला आग लागल्याची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस मध्ये एकूण ३२ प्रवासी होते. त्यातील सात प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा गावात हा अपघात झाला.
समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली. बस डावीकडे वळली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली आला. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता.
अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून २५ मृतदेह बाहेर काढले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.