जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील धानोरा गावातील तरूण शेतात मोटार चालू करत असतांना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धानोरा गावात सुनिल खंडू धनगर (वय-३०) हा तरूण शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याचे धानोरा शिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे मंगळवार २७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनिल धनगर हा शेतात गेला होता. त्यावेळी शेतात पाणी देण्यासाठी विहीरीजवळील ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यात त्याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत बुधवारी २८ जून रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, पत्नी सोनूबाई, भाऊ कैलास, दोन विवाहित बहिणी आणि तीन मुली असा परिवार आहे.