संशयितांना उस्मानाबाद जिल्ह्यातून एलसीबीने घेतले ताब्यात
धरणगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरापासून जवळच असलेल्या तसेच तालुक्यातील बांभोरी या गावामधील तरुणाचा गिरणा नदीपात्रामध्ये अज्ञात इसमानी डोक्यात धारदार शस्त्र मारून खून केल्याची घटना शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली होती. दरम्यान, हा खून विवाहितेच्या छेडखानीतून झाला असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने महिलेच्या पतीला व मंडळ अधिकाऱ्याला (आप्पा) उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. तेथे अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालून त्याची हत्या केली होती.
मयत तरुणाची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत धरणगाव पोलिसांसह एलसीबीचे पथक कामाला लागले होते. घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा तुटलेला मोबाईल सापडला होता. पोलिसांनी मयत आशिषच्या मोबाईलमधील माहितीचे विश्लेषण केले. तसेच, बांभोरी गावातून मिळालेल्या माहितीवरून गावातील छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय ४०, रा. बांभोरी ता. धरणगाव) हा घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचे समजले. तसेच, त्याने आशिषचा खून केला असल्याचे कळले. त्यांचे मोबाईल लोकेशन तपासले असता, ते उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचे दिसून आले.
त्यानुसार एलसीबीचे पथकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन संशयित छोटू उर्फ प्रमोद भीमराव नन्नवरे (वय ४०, रा. बांभोरी ता. धरणगाव) व त्याचे सोबत असणारे मंडळ अधिकारी (आप्पा) अमोल विक्रम पाटील (वय ३४, रा. कल्याणी नगर, दादावाडी परिसर, जळगाव) यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांना धरणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदर घटनेबाबत पोलिसांनी, संशयित आरोपी छोटू उर्फ प्रमोद नन्नवरे याला विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस करून माहिती घेतली. मयत आशिष शिरसाळे हा त्याचे पत्नीस अश्लील हावभाव करून नाव घेत होता. त्याला वारंवार समजावले. तरीही तो नाव घेत होता. पत्नीला त्रास देत असल्याचा राग छोटूच्या डोक्यात होता. २३ रोजी रात्री ९ वाजता आशिष ह्या एकटाच गिरणा नदीपात्राकडे जात असल्याचे संशयित छोटू नन्नवरे याला दिसले. त्याने त्याच्या डोक्यात पाठीमागून येऊन लोखंडी हत्याराने वार केला. त्यानंतर पाळधी येथील हॉटेल कुबेर येथे तो पळून गेला होता. एलसीबी पोलिसांनी तांत्रिक लोकेशनद्वारे त्याला उस्मानाबाद येथून ताब्यात घेऊन जळगावला आणले आहे.
तपासासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किसन नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश सोमवंशी, अशोक पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.