जळगावात जलतरण तलावाच्या
ठेकेदाराचा निष्काळजीपणा भोवला
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे एका तरुणाचा पोहताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १८ जून रोजी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी २२ जून रोजी दुपारी तरुणाच्या मित्राच्या फिर्यादीवरून चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, जळगाव) हा पोहताना बुडून मृत झाला होता. त्याचा मित्र फैजल जावेद बागवान (वय २०, जोशी पेठ, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. मयत सलमान, फैजल व त्यांचे मित्र अझहर अकबर बागवान (वय २५), शेख हुजेफा शेख अतिक (वय २०), फरान शाहिद बागवान (वय ३०, सर्व रा. जोशी पेठ, जळगाव) हे दि. १८ रोजी संध्याकाळी रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पोहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील जलतरण तलाव येथे गेले होते. तेथे ठेकेदार राहुल सूर्यवंशी हे काउंटरवर बसलेले होते. त्यांनी १०० रुपये घेऊन तरुणांना टोकन दिल्यावर ते पोहायला गेले होते.
त्यावेळी जलतरण तलावात सुमारे ५५ ते ६० मुले होती. सदर तलावाचे पाणी अशुद्ध असून त्याचा तळ दिसत नव्हता. सलमान, फैजल व मित्रांची जनरल बॅच असल्याने लाइफकोच नव्हता. तेथे सुरक्षाचिन्हे नव्हती. ५. ४५ वाजता सर्व मुले बाहेर आली. त्यावेळी फैजल, फरान, हुजेफा बाहेर येऊन कपडे बदलायला लागले. मात्र सलमान दिसला नाही. त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. तेव्हा तेथे काम करणारा पंकज आणि ठेकेदार राहुल सूर्यवंशी यांनी सहकार्य केले नाही. अखेर काठापासून १० फूट अंतरावर लाईन नं. ६ ते ७ दरम्यान वयस्कर लाईफ गार्डने पाण्यात उतरून तळाशी असलेल्या सलमानला बाहेर काढले. त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.
मित्रांनी व नागरिकांनी त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे त्यास मृत घोषित केले. त्यानुसार ठेकेदार राहुल विजय सूर्यवंशी, पंकज पवार, यादव महाले व लाईफ गार्ड सुनील चौधरी यांचेविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि मीरा देशमुख करीत आहे. दरम्यान, जलतरण तलावाचे राहुल सूर्यवंशी यांना खाजगी कंत्राट दिलेले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जलतरण तलावाची पाहणी करून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
क्रीडा कार्यालयाने वेळीच आपले कर्तव्य पार न पाडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फारूक शेख यांनी केलेली आहे.