धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला !
पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना आज पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली आहे. त्यानुसार कुटूंब प्रमुखाने तिघांची हत्या करत स्वत: आत्महत्या केली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील चैताली पार्क येथे राहत असलेल्या डाॅ अतुल शिवाजी दिवेकर यांच्या घरातून ही धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेत पल्लवी अतुल दिवेकर (डाॅ अतुल यांची पत्नी) वेदांतिका (मुलगी) अदत्विक (मुलगा) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर डाॅ अतुल दिवेकर यांनी स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी डाॅ अतुल दिवेकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी पल्लवी यांचा मृतदेह दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी पोलिसांनी पाहणी केली असता घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली.
मी पत्नीचा गळा आवळून तर दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांचा खून केला. मी स्वत: आत्महत्या करत असल्याचे या चिठ्ठीत नमुद होते. त्यानुसार पोलिसांनी लहान मुलांचे मृतदेह शोधण्यासाठी चिठ्ठीत नमुद विहीर गाठली. विहिरीला पाणी जास्त असल्याने मृतदेह आढळून आले नाही. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याचे काम वेगाने सुरू होते.
डाॅक्टरने स्वता:सह अख्खं कुटूंब संपवल्याच्या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमागच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.